वडगाव मावळ : आळंदीकडे पायी जाणार्या दिंडीमध्ये भरधाव वेगाने पिकअप टेम्पो घुसून भीषण अपघात झाला आहे.या अपघातात 26 वारकरी जखमी झाले असून 4 महिला वारकरी मृत्युमुखी पडल्याची घटना आज सकाळी 6 वा. च्या सुमारास घडली आहे.
या अपघातात 26 वारकरी जखमी झाले असून मृतांमध्ये विमल सुरेश चोरगे (वय ५०, रा.बिड खुर्द,खालापुर), जयश्री आत्माराम पवार (वय ५४, रा.भुतवली,खालापुर), सविता वाळकु येरम (वय ५६, रा.उंबरे) व संगीता वसंत शिंदे (वय २५,रा.कर्जत) या वारकरी महिलांचा समावेश आहे.
वडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कार्तिकी एकादशी वारीसाठी माऊली कृपा चॅरिटेबल ट्रस्ट( उंबरे,ता. खालापूर) येथील सुमारे २०० वारकरी पायी आळंदीच्या दिशेने चालले होते.
नायगाव येथील गुरुदत्त मंगल कार्यालयात काल रात्री त्यांनी मुक्काम केला व आज पहाटे साडेपाचच्या सुमारास पालखीने आळंदीकडे प्रस्थान केले . सकाळी सव्वासहाच्या सुमारास दिंडी साते फाट्याजवळ अतिथी हॉटेलसमोर आली असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेला पिकअप टेम्पो या पायी चालणाऱ्या वारीमध्ये घुसल्याने हा भीषण अपघात झाला.
जखमींवर कामशेतमधील महावीर हॉस्पिटल व वडगाव मावळ येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून पुढील तपास वडगाव पोलीस करत आहेत.