Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडअनाधिकृत बांधकामाने चिल्हार नदीचा प्रवाह बदलला ,आदिवासी व नागरिकांत भितीचे वातावरण..

अनाधिकृत बांधकामाने चिल्हार नदीचा प्रवाह बदलला ,आदिवासी व नागरिकांत भितीचे वातावरण..

कर्जत तहासिलदारांचे तोंडी आश्वासन म्हणजे आदिवासींच्या मानगुटीवर टांगती तलवार..

भिसेगाव-कर्जत(सुभाष सोनावणे)
कर्जत तालुक्यातील रजपे ग्रामपंचायत हद्दीतील मौजे टेंभरे येथील चिल्हार नदीकाठी मुंबईच्या एका धनिकाने स्थानिक रहिवाश्याची जागा घेऊन ठेकेदाराला हाताशी धरून नदीच्या धोक्याच्या पाण्याच्या पातळीत बेकायदेशीर अनधिकृत दगडी भिंत उभारल्याने आत्ताच्या संततधार अतिवृष्टी पावसाच्या पाण्यामुळे प्रवाह बदलून शेजारीच राहणाऱ्या आदिवासी कुटुंबाच्या जीवावर बेतण्याची चिन्हे असून स्थानिक ग्रामस्थ श्री रघुनाथ जानू शीद यांचे अतोनात नुकसान झाले असून या गंभीर बाबीकडे उपोषणाचा ईशारा दिलेल्या ग्रामस्थ व आदिवासी बांधवांना उपोषणापासून तोंडी आश्वासन देऊन परावृत्त करणारे कर्जत तहसीलदार विक्रम देशमुख यांनी याची तातडीने दखल घेण्याची मागणी येथील ग्रामस्थानीं केली आहे.

अतिवृष्टीमुळे संततधार पावसाने पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नदीने आपला प्रवाह सोडून वेगळ्या दिशेने प्रवाह नदी पात्रात केलेल्या अनधिकृत बांधकामाने होऊन दि.२१ जुलै २०२१ च्या रात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास आदिवासी कुटुंबांच्या घरात पाणी शिरले ,त्यामुळे त्यांचे नुकसान झाले तर स्थानिक रहिवासी श्री रघुनाथ जानू शीद यांच्या घरात मोठ्या प्रमाणावर पाणी घुसले व त्यांच्या गुरांच्या गोठयाच्या बाजूला बांधलेल्या दोन म्हैस व दोन गाई ह्या वाहून गेल्या आहेत.

मात्र नागरिक सतर्क राहिल्याने जीवावर बेतण्याची घटना टळली असून ग्रुप ग्रामपंचायत रजपे व ग्रामस्थांनी वेळो वेळी कर्जत प्रांत अधिकारी, कर्जत तहसीलदार व पाटबंधारे विभाग यांना पत्रव्यवहार करुन सुध्दा प्रशासनाने गंभीर दखल न घेता जागे मालक ,मुंबईचा धनिक व ठेकेदाराला पाठीशी घालून दुर्लक्ष करत असल्याने हि पूरग्रस्त जीवघेणी परिस्थिती उदभवली असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.आठ दिवसांत बांधकाम तोडू , असे तोंडी आश्वासन उपोषणाचा ईशारा दिल्यावर झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत कर्जत तहसीलदार विक्रम देशमुख यांनी दिलेले असताना आता महिना उलटून गेला तरी अजून आश्वासानाची पूर्तता झाली नसून हे कृत्य म्हणजे मुंबईकर धनिकाला पाठीशी घालण्याचे काम असल्याचा आरोप येथील रहिवासी प्रमोद पिंगळे यांनी केला आहे.

आज झालेल्या मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसुन नुकसान झालेले आहे.एवढं मोठ नुकसान होऊनही जीवावर बेतण्याची घटना प्रशासन गांभीर्याने न घेता दुर्लक्ष्य करत असेल तर भविष्यात ह्या नदीकाठी असलेले दगडी कम्पाउंडचे बांधकाम कित्तेक जनांचा जीव घेईल हे सांगता येणार नाही,असा सवाल देखील प्रमोद पिंगळे यांनी प्रशासनास केला आहे.तरी पुन्हा शासनाने ह्या प्रकरणाकडे लक्ष देऊन येथील नदी पात्रातील बांधकाम काढून टाकावे ही ग्रामस्थांची व आदिवासी यांची मागणी असून भविष्यात जीवितहानी झाल्यास प्रशासन ह्यास जबाबदार असेल, प्रशासन जीवितहानी होण्याची वाट बघत आहेत काय? असा संतापजनक मत व्यक्त करतरजपे ग्रामपंचायत हद्दीतील बहुतेक शेतकरी वर्गाचे शेतीचे नुकसान झाले आहे तरी नुकसानाची पाहणी करुन शासनाने त्वरित पंचनामे करावे, अशी मागणी ग्रुप ग्रामपंचायत रजपे थेट सरपंच सौ .दिपाली प्रमोद पिंगळे तसेच ग्रामस्थांनी केली आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page