लोणावळा : इंद्रायणी नदीपात्र खोलीकरणाच्या मागणीसाठी कार्ला परिसरातील नागरिकांनी एकविरा कृती समितीच्या माध्यमातून मावळ तहसील कार्यालयासमोर सोमवारी ( 14 मार्च ) बेमुदत उपोषण सुरु केले होते. मावळचे तहसिलदार मधुसूदन बर्गे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण सोमवारी सायंकाळी मागे घेण्यात आले.
पावसाळ्यात लोणावळा परिसरात पडणारा पाऊस , टाटा धरणातून नदीपात्रात येणारे पाणी यामुळे नदीपात्राला पूर येतो . हे पाणी आजुबाजुच्या शेतीमध्ये पसरते व शेतीचे नुकसान होत आहे . अनेक घरांना व सोसायट्यांना पाण्याचा विळखा बसतो . तेवढ्या वेळापुरती आपात्कालीन यंत्रणा जागी होऊन काम करते मात्र समस्येच्या मुळपर्यत जात नाही . जोपर्यत नदीपात्र खोल होणार नाही तोपर्यत या भागातील समस्या सुटणार नसल्याने मावळ तहसीलदारांनी याप्रकरणी लक्ष घालत तात्काळ नदीपात्र खोलीकरणाच्या कामाचे आदेश संबंधितांना द्यावेत या मागण्यांसाठी सदरचे उपोषण करण्यात आले होते.
यावेळी तहसिलदारांनी जलसंपदा विभागाशी बैठक घेत इंद्रायणी नदीपात्राला मिळणारे नाले सफाई कामाचे सर्वेक्षण करून 31 मार्च पर्यंत अहवाल सादर करणे , इंद्रायणी नदीचे सर्वेक्षण करून नदीला पूर येणार नाही याकरिता नदी खोलीकरणाचा धोरणात्मक निर्णय असल्याने त्याचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठपुरावा करणे व वलवण धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्याबाबत टाटा व्यवस्थापनाशी येत्या 22 मार्च रोजी आढावा बैठक घेत अंतिम निर्णय घेण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर एकविरा कृती समितीने सदरचे उपोषण मागे घेतले आहे.