Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जतमध्ये जिल्ह्याबाहेरच्या नागरिकांचे लसीकरण होत असल्याने नागरिकांत संताप,जिल्हा बंदी कायद्याची देखील ऐसी...

कर्जतमध्ये जिल्ह्याबाहेरच्या नागरिकांचे लसीकरण होत असल्याने नागरिकांत संताप,जिल्हा बंदी कायद्याची देखील ऐसी की तैसी..

भिसेगाव-कर्जत (सुभाष सोनावणे)-कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील लसीकरण मा.रायगड जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने बंद झाल्यावर कर्जतच्या नागरिकांच्या सोयीसाठी लसीकरण केंद्र हे कर्जत शहरातच व्हावे , यासाठी कर्जत नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ.सुवर्णा केतन जोशी यांनी जिल्हाधिकारी , जिल्हा वैद्यकीय अधिक्षक तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगराध्यक्ष राजेश दादा लाड व नगरसेवक सोमनाथ ठोंबरे यांनी पालकमंत्री अदितीताई तटकरे यांना दिलेल्या निवेदनामुळे व कर्जतकरांना ग्रामीण भागात लसीकरणास जाताना होणाऱ्या त्रासाबाबत चर्चेतुन व भाजप कोकण संघटक सुनील गोगटे यांनी देखील जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनामुळे शहरात चार ठिकाणी लसीकरण सुरू होणेबाबत सकारात्मक प्रतिसाद लाभला.

मात्र ऑनलाइन लसीकरण करण्याच्या पद्धतीमुळे जिल्ह्याबाहेरचे नागरिक कर्जतमध्ये लसीकरण करण्यास येत असल्याने स्थानिकांना लसीकरण करता येत नसल्याने आम्ही लस कुठे व कशी घेणार ? असा संतप्त सवाल कर्जतमध्ये घुमत आहे.


कर्जतमध्ये चार ठिकाणी म्हणजे अभिनव शाळा , मुद्रे , दहिवली – डोंबे शाळा व भिसेगाव – गुंडगे येथील नागरिकांसाठी जय अंबे माध्यमिक शाळा येथे लसीकरणाची व्यवस्था करावी , अशी मागणी नगराध्यक्षा सौ.सुवर्णा जोशी तसेच राष्ट्रवादीचे राजेश लाड व नगरसेवक सोमनाथ ठोंबरे , भाजपाचे सुनील गोगटे यांनी केली असता त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळत अभिनव शाळा येथे लसीकरणास प्रारंभ झाला.

मात्र प्राप्त माहीती नुसार १८ ते ४५ वयोगटातील ९९ टक्के लसीकरण हे रायगड जिल्ह्याच्या बाहेरून आलेल्या नागरिकांचे झाले आणि फक्त कर्जतला जेमतेंम १ टक्का लसीचा वाटा मिळाला असल्याचे दिसून येते . त्यामुळे नागरिकांत संताप पसरला असून शासनाच्या जिल्हा बंदीचे आदेश देखील चकाना – चुर झाल्याचे दिसून येत आहे . प्रशासनाने जिल्हा बंदी जाहीर केली असताना देखील हे बाहेरचे नागरिक कर्जतमध्ये आलेच कसे ? यांच्या वर कुणाचा अंकुश नाही का ? लसीकरण करताना जर आधारकार्ड बघितल्यावर त्यावर पत्ता असताना बाहेरच्या नागरिकांना लसीकरण करू नये ,व मा.जिल्हाधिकारी यांनी यांत लक्ष द्यावे , अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.


त्यातच कर्जत तालुका हा गोर गरीब , कष्टकरी , कामगार , आदिवासी बहुल भाग असल्याने ऑनलाईन पद्धतीने लसीकरण करणे हे शासनाचे धोरण योग्य आहे का , व हे कितपत यशस्वी होणार , हा संशोधनाचाच भाग भविष्यात पहाण्यास मिळणार आहे , अजूनही जेष्ठ नागरिक व ४५ वयाच्या पुढच्या नागरिकांचे लसीकरण बाकी आहे , त्याचे काय ? हा देखील न समजणारे कोडे आहे , मात्र यामुळे अनेक जीव लसीकरणा वाचून राहिल्यास त्यास जबाबदार कोण , व त्यांनी कोरोनाशी झुंज देणे , हेच विधिलिखित असणार का ? असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत.

- Advertisment -

You cannot copy content of this page