लोणावळा : वर्षप्रतिपदेच्या निमित्ताने कुटुंब प्रबोधन विभागाकडून 3 एप्रिल 2022 रोजी श्लोक व मंत्र पठण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. अगोदर समजू या “कुटुंब प्रबोधन म्हणजे काय “?
भारतीय कुटुंब व्यवस्था ही सनातन संस्कृती चे अविभाज्य अंग आहे. एकत्र कुटुंब पद्धती पासून आपण बदल स्वीकारत आत्ता विस्तारित व विभक्त कुटुंब अशा पायरीवर आहोत. कुटुंब पद्धती जर सशक्त राहिली तरच समाज व देश बलवान होईल. हा विचार घेऊनच कुटुंब प्रबोधन संपूर्ण देशभर कार्यरत आहे.
कुटुंब प्रबोधनाचे वेगवेगळे सहा आयाम आपला संपूर्ण परिवार शारीरिक मानसिक व सामाजिक दृष्ट्या सदृढ करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहेत.
परिवारातील प्रत्येक घटकाचा विचार करून कुटुंब प्रबोधन परिवर्तन घडवून आणण्यासाठी एक प्रभावी योजना “अमृत परिवार”या नावाने कार्य करीत आहे.आयोजित स्पर्धेत 130 वेगवेगळ्या वयोगटातील स्पर्धकांनी भाग घेतला. 12 परीक्षकांनी 4 वेगवेगळ्या वयोगटातील 12 विजेत्यांची निवड केली. सदर स्पर्धा ॲड. बापूसाहेब भोंडे शाळेत घेण्यात आली होती.
सामाजिक समरसतेचे उत्तम उदाहरण कार्यक्रमात बघायला मिळाले. भारतीय संस्कृतीला जपणाऱ्या सर्व पंथानी व विचारधारकांनी स्पर्धेत उत्साहाने भाग घेतला. वैज्ञानिक दृष्टया श्लोक व मंत्र पठणामुळे बुद्धी आणि मनावर सकारात्मक परिणाम होतो हे सिद्ध झालय. म्हणून असे जास्तीत जास्त कार्यक्रम घडवून आणले गेले पाहिजेत असा आशय सर्वांनी व्यक्त केला.विजेत्यांना ट्रॉफी व भगवदगीता देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.