Tuesday, April 16, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडठेकेदारी आणि टक्केवारीमुळे कर्जत तालुक्यातील रस्त्यांची दुर्दशा !

ठेकेदारी आणि टक्केवारीमुळे कर्जत तालुक्यातील रस्त्यांची दुर्दशा !

भारतीय जनता पक्षाने रस्त्यांचा एक्सरे रिपोर्ट मांडला प्रदर्शनातून..

भिसेगाव-कर्जत(सुभाष सोनावणे)
कर्जत तालुक्यातील रस्त्यांच्या दुरावस्थेला येथील ठेकेदारी आणि टक्केवारी जबाबदार असून हेच राजकीय नेते , आणि हेच ठेकेदार असल्याने येथील राजकीय परिस्थिती देखील या रस्त्यांच्या दुरावस्थेला जबाबदार असल्याचे चित्र काही वर्षांपासून दिसून येत आहे.मात्र भारतीय जनता पक्षाने हि परिस्थिती ऐन जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तोंडावर प्रदर्शनाव्दारे पर्दाफाश करून नागरिकांसमोर आणल्याने नागरिकांत संतापाचे वातावरण पसरले आहे.

भारतील जनता पक्ष कर्जत तालुका यांच्यावतीने तालुक्यातील राज्य महामार्ग आणि जिल्हा परिषद अंतर्गत असणा-या रस्त्यांवर पडलेल्या खड्यांचे फोटो प्रदर्शनाचे आयोजन
कर्जत तालुक्यातील जनतेसमोर मांडण्यासाठी आज लोकमान्य टिळक चौक, कर्जत येथे फोटो प्रदर्शन मांडण्यात आले आहे. या प्रदर्शनाची संकल्पना आणि आयोजन राजेश भगत-कर्जत तालुका भाजपा सरचिटणीस यांची असून या प्रदर्शनात तालुक्यातील प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत जोडरस्त्यांची स्वता पाहणी करून तेथील सद्य स्थिती कँमे-यात कैद करून जनतेसमोर मांडली आहे.

आज या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले असून जनसामान्यांनी आपल्या मनातील खदखद आणि तीव्र संताप यावेळी बोलून दाखविला.याप्रसंगी भारतील जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर, किसान मोर्चा कोकण संपर्कप्रमुख सुनिल गोगटे, जिल्हा सरचिटणीस दिपक बेहेरे, जिल्हा चिटणीस रमेश मुंडे, पालिकेचे उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल , कर्जत शहर अध्यक्ष बळवंत घुमरे, कर्जत सरचिटणीस प्रकाश पालकर, संजय कराळे, संदिप म्हसकर, केशव तरे , सर्वेश गोगटे त्याचप्रमाणे इतर कार्यकत्यांनी जोरदार घोषणाबाजी करत या दुरावस्थेचा व संबंधितांचा निषेध नोंदविला.

या प्रदर्शनात नेरळ – कळंब राज्यमार्ग, साईमंदिर – पेशवाई रोड , चिंचवली – कडाव मार्ग, कर्जत – कोंदिवडे रस्ता , नेरळ – ममदापुर, दामत – भडवळ आदी रस्त्यांची दारुण अवस्थेचे वास्तव मांडण्यात आले असून गेल्या दोन महिने गणपतीपुर्वी तात्पुरते खड्डे भरले जायचे पंरतू, यावेळी तेही काम झालेले नाही. यामुळे प्रत्येक रस्त्यांवर अनेक अपघात, दुर्घटना घडल्याचे दिसून आले आहे.

आज या खड्ड्यांमुळे वाहनचालकापासून ते आजारी वयोवृध्द आणि गरोदर महिलांना याच्या यातना सहन कराव्या लागत असून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीना याविषयी कुठलीही कळकळ दिसून येत नाही , ही शोंकातिका असल्याचे भाजपाने नागरिकांना दाखवून दिले आहे.याप्रसंगी बोलताना राजेश भगत, सरचिटणीस भारतीय जनता पक्ष – कर्जत हे म्हणाले की, आज तालुक्यातील सर्वच प्रश्न ऐरणीवर असून येथील लोकप्रतिनिधींची निष्प्रभता दिसून येत आहे. जनतेप्रती कुठलीच संवेदना नसलेले लोकप्रतिनिधी असल्यानेच तालुक्यातील रस्त्यांची इतकी विदारक स्थिती आहे.

आम्ही या प्रदर्शनातून कर्जत तालुक्याचा ” एक्सरे रिपोर्ट ” मांडला आहे. यावर नुसती मलमपट्टी करून चालणार नसून ठेकेदारी आणि टक्केवारीमुक्त काम झाले तरच जनतेला दर्जेदार रस्ते मिळतील व जे रस्ते वर्षोनुवर्षे टिकावू आणि दर्जेदार असतील यावर प्रकाश टाकत जर का येत्या १५ दिवसात यावर कार्यवाही सुरू झाली नाही , तर भारतीय जनता पक्ष गप्प बसणार नाही , याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल , असा सज्जड ईशारा तालुका सरचिटणीस राजेश भगत त्यांनी संबंधित खात्याच्या अधिका-यांना दिला आहे तसेच , जनताही आपला संताप योग्य रितीने येणाऱ्या निवडणुकीत व्यक्त करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page