पुणे ,२३/११/२०२२ अण्णा हजारे प्रणित भ्रष्ट्राचार विरोधी जन आंदोलन न्यास,खेड यांच्या वतीने गटविकास अधिकारी, खेड यांना राजगुरूनगर, खेड तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यालये कार्यालयीन वेळेत पूर्ण सुरू रहावीत यासाठी निवेदन देण्यात आले.
ग्रामस्थांच्या सोयीसाठी प्रत्येक ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांनी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत कार्यालयात हजर असणे आवश्यक असताना बहुतांश ग्रामपंचायतीत ग्रामसेवक जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध नसतात,काही ग्रामसेवकांची पदे रिक्त असून भरती न झाल्याने एका ग्रामसेवकानवर दोन ग्रामपंचायतीचा कार्यभार सांभाळावा लागतो हे जरी खरे असले तरी ग्रामपंचायतीत कार्यालयीन पूर्ण वेळ ग्रामसेवक नसणे ही बाब अत्यंत गंभीर आहे.याबाबत आपल्याकडून संबंधित ग्रामसेवकांना लेखी समज देवून त्याबाबत आम्हास कारवाई बाबत लेखी कळवावे अशी मागणी खेड तालुक्यातून जिल्हा अध्यक्ष सुरेशभाऊ टाकळकर यांनी लेखी निवेदन देवून गटविकास अधिकारी खेड याना केली आहे.
जनतेच्या आरोग्यासाठी शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून प्रत्येक गावात आरोग्य केंद्राच्या इमारती बांधून उभ्या केल्या आहेत परंतु या केंद्रात कधीही नागरिकांना सेवा उपलब्ध होत नाही असे आमच्या निदर्शनास आले असल्याचे देखील टाकळकर यांनी गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
ग्रामसेवक,आणि आरोग्य अधिकारी यांना सेवेत असलेल्या ठिकाणी राहणे आवश्यक असताना तश्या सुविधा त्यांना शासनाकडून मिळत असताना ते मात्र जनतेसाठी सुविधा पुरविण्यात अपयशी ठरत असल्याचे चित्र संपूर्ण खेड तालुक्यात आढळून आले आहे.गटविकास अधिकारी यांनी अश्या कामचुकार करणाऱ्या अधिकारी यांचेवर कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत अन्यथा अश्या वेळेवर न येणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला अण्णा हजारे प्रणित भ्रष्ट्राचार विरोधी जन आंदोलन समितीकडून टाळे ठोकण्यात येईल असा इशारा समितीचे जिल्हाध्यक्ष सुरेशराव टाकळकर आणि खेड तालुका अध्यक्ष प्रकाश पाचरणे यांनी निवेदनात दिला आहे.