Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जत नगर परिषदेवर " प्रशासकीय " राजवट !

कर्जत नगर परिषदेवर ” प्रशासकीय ” राजवट !

मुदत संपल्याने ” मुख्याधिकारी वैभव गारवे ” यांच्याकडे सर्व अधिकार…

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत नगर परिषदेतील लोकप्रतिनिधींचा कारभार २६ फेब्रुवारी २०२४ रोजी संपुष्टात आला असून मुदत संपल्याने पालिकेवर प्रशासकीय राजवट येवून याचे सर्व अधिकार आत्ता मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्याकडे आले आहेत . सन २०१९ फेब्रुवारी च्या महिन्यात त्यावेळी सार्वत्रिक निवडणुका झाल्या होत्या . त्याची पाच वर्षानंतर आता मुदत संपली आहे.

कर्जत नगर परिषदेवर सन २०१४ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता होती . त्यांनंतर झालेल्या २०१९ साली थेट नगराध्यक्ष महिला जनरल पडल्याने शिवसेना – भाजपा – आर पी आय अशा महायुतीने राष्ट्रवादी काँग्रेस – राष्ट्रीय काँग्रेस – मनसे – बसपा प्रणित भीमशक्ती शिवशक्ती व स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष अशी महाआघाडी झाली होती . यांत थेट नगराध्यक्ष पदी शिवसेनेच्या सौ. सुवर्णा जोशी यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार प्रतिक्षा लाड या प्रतिस्पर्धी उमेदवारांचा पराभव करून मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या होत्या . यावेळी महायुतीचे १० तर महाआघाडीचे ८ उमेदवार निवडून आले होते . यानंतर २ स्वीकृत नगरसेवक म्हणून घेण्यात आल्याने एकूण २० लोकप्रतिनिधी पालिकेचा कारभार करत होते .

या पाच वर्षात दोन वर्षे कोरोना काळात गेली , कोरोना काळात देखील त्यांनी कर्जतकर नागरिकांची सुरक्षा केली , तर उर्वरित ३ वर्षांत नगराध्यक्ष सौ. सुवर्णा जोशी यांनी मोठ्या प्रमाणात सर्वच प्रभागात उल्लेखनीय कामे केली . विशेष म्हणजे त्यांना मावळ लोकसभा मतदार संघाचे शिवसेनेचे खासदार आप्पासाहेब बारणे , तर कर्जत – खालापूर मतदार संघाचे शिवसेनेचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचे सहकार्य नेहमीच लाभले . हे तिन्ही लोकप्रतिनिधी शिवसेना पक्षाचे होते . त्यामुळे विकास कार्यांना निधी देखील मोठ्या प्रमाणात मिळाला , मात्र नंतर शिवसेनेत फूट पडल्याने नगराध्यक्षा ठाकरे गटातच राहिल्या होत्या.
यामुळे विकास कार्यात थोडी मरगळ आली होती . तरीही नगराध्यक्ष सौ. सुवर्णा जोशी यांनी बऱ्यापैकी विकास कार्य करून कर्जतकरांना सोई सवलती दिल्या . वाढत्या नागरिकीकरण व इमारतींमुळे नागरिकांना भेडसावणारी पाण्याची स्कीम ” पाणी पुरवठा अमृत योजना ” या अंतर्गत त्यांनी जाता जाता ५८ करोड रुपयांची योजना तांत्रिक मंजुरी मिळवून आणली असून त्यांना त्याचे भूमिपूजन वेळेअभावी करता आले नाही , तर दरवर्षी १६० करोड च्या वर बजेट नुसार त्यांनी प्रत्येक प्रभागात विकास कामे केल्याने खरोखरच नगराध्यक्षा सौ. सुवर्णा जोशी यांचा काळ हा ” सुवर्ण काळ ” म्हणून सर्वांच्याच लक्षात राहील.
- Advertisment -

You cannot copy content of this page