Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जत भूमी अभिलेख कार्यालयात कर्मचारी वर्गाचा तुटवडा !

कर्जत भूमी अभिलेख कार्यालयात कर्मचारी वर्गाचा तुटवडा !

प्रलंबित कामांमुळे नागरिकांच्या कामांचा खोळंबा..

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे )कर्जत तालुका हा शेतकरी राजांचा तालुका बहुल भाग आहे . आपल्या जमिनीची काळजी व सुरक्षेसाठी त्याला नेहमीच झगडावे लागते . मोठ्या प्रमाणात जागा असल्याने ईथे जमिनीची खरेदी – विक्री देखील मोठ्या प्रमाणात होते . मुंबईचे धनिक येथील जागा सोन्याच्या भावाने घेऊन विकेंड ऑफ साठी ” चमकेश ” फार्म हाऊस तयार करून हौस – मौज करण्यासाठी कुटुंबासहित येथे येत असतात , म्हणूनच येथील जागेला अनन्य साधारण महत्व आहे , नेमका याचाच फायदा येथील भूमी अभिलेख कार्यालय घेत असून जागेची प्रकरणे निकालात काढण्यासाठी लाखोंची ” लाच ” मागून त्यांना रंगेहात पकडल्याची प्रकरणे ताजी आहेत . मात्र याला जबाबदार देखील वरिष्ठ कार्यालये असून अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने अनेक प्रकरणे धूळ खात पडली असून आपली कामे कधी होणार ? म्हणून शेतकरी बांधवांना खेट्या माराव्या लागत आहेत व येथूनच ” वाम मार्गाचा ” अवलंब देखील सुरू होत असल्याचे चित्र येथे पाहण्यास मिळत आहे.

कर्जत तालुका हा मोठा असून येथे ५२ ग्रामपंचायत आहेत . येथे दुबार शेत जमीन असल्याने पेज नदी व टाटा पॉवर हाऊसचे पाणी , राजनाला असे बारा महिने पाणी असल्याने येथील जमिनीला चांगलाच भाव मिळतो . त्यातच शेतकरी बांधव देखील आपल्या जमिनीची हद्द कायम करणे , विकलेल्या जमिनीचा पोट हिस्सा करणे , जमिनीची मोजणी करणे , गट बुक नकाशा काढणे यासाठी अति तातडीची मोजणीसाठी ज्यादा पैसे भरून देखील येथे महिनोन्महिने मोजणी होत नसल्याचे दिसून येत आहे.
पोट हिस्सेची प्रकरणे तर पाच महिने होऊनही व ज्यादा रक्कम भरूनही अजूनही अपुरा कर्मचारी वर्ग म्हणून अनेक प्रकरणे धूळ खात पडली आहेत . साधा गट बुक नकाशा काढण्यास देखील १० दिवस लागतात , अश्यामुळे शेतकरी बांधव तसेच जमिन धारक यांच्यात भूमी अभिलेख कार्यालया विषयी संतापाची लाट पसरली आहे.या कार्यालयाचे भूमीलेख उपअधिक्षक हे आजारी असल्याने रजेवर आहेत , तर अतिरिक्त भार असलेले काळे साहेब हे खालापूर कार्यालयाचे काम पहात असल्याने आठवड्यातून फक्त एक वार मंगळवारीच कर्जत येथे उपस्थित रहातात त्यामुळे एका दिवसांत किती कामे होणार ? यावर देखील प्रश्नचिन्ह उभे रहात आहे.
वरिष्ठ कार्यालयातून कर्मचारी मागवून येथील पोट हिस्सेची जागा मोजणी प्रकरणे निकालात काढली जातील , असे येथून सांगण्यात येते , मात्र हि कहावत ” आळवावरच्या पाण्याच्या थेंबा सारखी ” बनावट ” वाटत असून , येथील अतिरिक्त भार असलेले उपअधिक्षक काळे साहेबांनी यावर त्वरित पाऊले उचलून जनतेची व शेतकरी बांधवांची कामे त्वरित होण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे कर्मचारी वर्गाची सातत्याने मागणी करावी , अशी संतप्त प्रतिक्रिया कर्जत तालुक्यातून उमटत आहेत.
- Advertisment -

You cannot copy content of this page