लोणावळा (प्रतिनिधी): आतवण टायगर पॉईंट येथे वेळेचे बंधन न पाळणाऱ्या आठ विनापरवाना दुकान व्यावसायिकांवर सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक आणि लोणावळा ग्रामीण पोलीसांनी कारवाई केली.
सदर कारवाई ही दि.23 एप्रिल रोजी पहाटे 4:00 वा.च्या सुमारास करण्यात आली. लोणावळा उप विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक आय पी एस सत्यसाई कार्तिक आणि लोणावळा ग्रामीण पोलीस यांच्या संयुक्तरित्या सदर कारवाई करण्यात आली. पहाटे चार वाजता आतवण टायगर पॉइंट या पर्यटन स्थळी काही विनापरवाना टपरी व्यावसायिक वेळेचे बंधन न पाळल्याचे आढळून आल्याने त्यांचेवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 33 नुसार कारवाई करण्यात आली. यापुढे वेळेचे बंधन पाळून व्यवसाय करावा, सकाळी सात ते रात्री सात या वेळातच आपला व्यवसाय करावा आणि पर्यटकांनी देखील येथे सायंकाळी सात नंतर जावू नये असे आवाहन करण्यात आले.
सदरची कारवाई आय पी एस सत्यसाई कार्तिक त्यांच्या पथकातील सुभाष शिंदे, लोणावळा ग्रामीण चे सहायक पोलीस निरीक्षक निलेश माने, केतन तळपे, मच्छीद्र पानसरे, प्रणय कुमार उकिरडे यांनी केली.