Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडभिसेगावात दुफळी नको म्हणून मी अद्यापी तटस्थ - नगरसेवक सोमनाथ आप्पा ठोंबरे..

भिसेगावात दुफळी नको म्हणून मी अद्यापी तटस्थ – नगरसेवक सोमनाथ आप्पा ठोंबरे..

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कुठलेही नेतृत्व हे त्याच्या सोबत असलेल्या कार्यकर्ते, जीवा भावाचे सोबती व मित्र परिवाराच्या संख्येवर अवलंबून असते . ऐन उमेदीच्या वयापासून ज्या मित्रांमुळे व गावातील ज्येष्ठ नागरिक , माय बहिणींच्या आशीर्वाद व प्रेमामुळे मी इथवर मजल मारली , नेहमीच गावात दुफळी निर्माण होणार नाही , गावाचा विकास कसा होईल , हे साधत आलेली समस्या सर्वांच्याच सहकार्याने सोडविली , अशा सर्व ग्रामस्थ व कार्यकर्त्यांची एकजूट ठेवण्यासाठी आजही मी तटस्थ भूमिका घेतली असून कुठल्याही पक्षाला पाठींबा दिला नसल्याचे , कर्जत नगर परिषद हद्दीतील भिसेगाव प्रभागाचे नगरसेवक सोमनाथ आप्पा ठोंबरे यांनी आपले भावनिक मत व्यक्त केले.

सोमनाथ आप्पा ठोंबरे हे कर्जत नगर परिषदेचे भिसेगाव प्रभागाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान नगरसेवक आहेत . राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तीन महिन्यांपूर्वी दुभंगल्या नंत्तर कर्जत न. प. हद्दीतील राष्ट्रवादीचे आठ नगरसेवकांपैकी यातील काही नगरसेवक – नगरसेविका राष्ट्रवादी अजित दादा पवार गटात तर काही मा. आमदार सुरेश भाऊ लाड यांच्या सोबत आहेत , मात्र नगरसेवक सोमनाथ ठोंबरे यांनी अजून कुठलेच पाऊल उचलले नसल्याने याबाबत त्यांची प्रतिक्रिया विचारली असता , मी एकट्याने निर्णय घेवून कुठल्या पक्षाला पाठींबा दिल्यास भिसेगावात या राजकीय अस्थिरतेमुळे दुफळी होवून आजपर्यंत जी गावाची एकजूट आहे , ती लोप पावणारी आहे , म्हणूनच मी आजपर्यंत तटस्थ राहून अद्यापी कुठलाच विचार केला नाही , हा निर्णय मी माझ्या जीवा भावाचे युवा कार्यकर्ते व ग्रामस्थांवर ठेवला आहे , ते जो निर्णय घेतील त्यालाच मी पाठींबा देणार आहे.

भिसेगावातून सोमनाथ आप्पा ठोंबरे यांनी दोन वेळा नेतृत्व केले आहे . सन २०१४ साली ते स्वीकृत नगरसेवक तर दुसऱ्यांदा सन २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत सर्वांच्या सहकार्याने दणदणीत मतांनी निवडून गेले . गावात त्यांचे सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत .येथील असलेल्या सुयोग मित्र मंडळाचे ते गेली पंचवीस वर्षे अध्यक्ष होते . गावातील सर्वांच्या समस्या ते पोटतिडकीने सोडवतात , सण – उत्सवात हिरीरीने भाग घेतात , कोरोना काळात त्यांनी गावातील नागरिकांसाठी खूप मेहनत घेवुन लसीकरण , स्वच्छता मोहीम , फवारणी , मास्क व स्यानीटायझर वाटप , गरीब – गरजूंना धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले होते.
विद्यार्थ्यांना खाऊ व वह्या वाटप आदी सामाजिक कार्यात ते नेहमीच अग्रेसर असतात , हि सर्व कामे ते युवा मंडळ व ग्रामस्थांच्या मदतीने करतात , म्हणूनच आताची राजकीय अस्थिरता पाहून ” कुठला झेंडा घेवू हाती ” , अशी परिस्थिती असून येणाऱ्या काळात कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया , ग्रामस्थांचा विचार घेवूनच त्यांना जे योग्य वाटेल असाच अंतिम निर्णय घेईन , असे मत नगरसेवक सोमनाथ आप्पा ठोंबरे यांनी व्यक्त केले.
- Advertisment -

You cannot copy content of this page