Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडमाणकीवली शेणगाव रस्त्याला डबक्याच्या स्वरुप मार्गावर पडलेत मोठं मोठं खड्डे..

माणकीवली शेणगाव रस्त्याला डबक्याच्या स्वरुप मार्गावर पडलेत मोठं मोठं खड्डे..

(खालापुर दत्तात्रय शेडगे)
खालापूर तालुक्यातील ग्रामीण भागांना जोडणार्‍या बहुतांशी रस्त्यांची पावसाळ्यात अक्षरश: चाळण झाली असून लहानमोठ्या अपघातांबरोबर वाहतूककोंडीचा प्रश्‍न निर्माण होत आहे. दैनंदिन त्रासामुळे सर्वसामान्य नागरिकांसह प्रवासी, वाहन चालक कमालीचे संतप्त झाले आहेत.

त्यातच तालुक्यातील माणकीवली शेणगाव रस्त्यावर होणाऱ्या ओव्हरलोड वाहतूकीमुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने या रस्त्याला डबक्याचे स्वरूप प्राप्त झाल्याने हा मार्ग अपघाताला आमंत्रण देत आहे, त्यामुळे प्रवासी वर्गासह वाहन चालकांमध्ये संंबधित प्रशासना विरोधात नाराजी व्यक्त केली जात असून संबंधित प्रशासनाने याचे गांभीर्य घेत या मार्गाची लवकरात लवकर दुरुस्ती करून ओव्हरलोड वाहतूक थांबवावी अशी मागणी माणकीवलीचे माजी उपसरपंच तथा विदयमान सदस्य अजय भारती व विदयमान उपसरपंच विकास रसाळ यांनी केली असून यावर लवकर उपाययोजना न राबविल्यास भारती आणि रसाळ यांनी आंदोलनाचा इशारा दिल्याने संबंधित प्रशासन याचे गांभीर्य घेणार का ? पाहणे गरजेचे आहे.

खालापूर तालुक्यातील असंख्य रस्त्याची अवस्था दयनीय बनल्याने रस्त्यात खड्डा की, खड्ड्यात रस्ता ही स्थिती निर्माण झाल्याने याचा नाहक त्रास प्रवासी वर्गाला करावा लागत आहे. त्यातच माणकीवली – शेणगाव या सततच्या वर्दळीच्या रस्त्याची अवस्था सद्यस्थितीला पाहण्याजोगी झाली आहे. रस्त्यावर इतके मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे की वाहन कसे चालवायचे, असा प्रश्न नागरिकांना पडला असता या मार्गावर रोज छोटे – मोठे अपघात घडत असून या रस्त्यावरून रस्त्याच्या क्षमतेपेक्षा अती वजनी वाहने ये – जा करीत असल्याने या रस्त्याची अवस्था अक्षरशः चाळणमय झाली असल्याने पावसाच्या दिवसात या रस्त्याला डबक्याचे स्वरूप प्राप्त झाल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.


तर आधीच हा रस्ता अरुंद त्यात खड्ड्यांचे साम्राज्य, मोठी कसरत करून नागरिकांना या रस्त्यावर प्रवास करावा लागत आहे. सदर रस्त्यावर डागडुजी करून नागरिकांना होणार्‍या त्रासातून मुक्त करावे, अशी मागणी सध्या जोर धरत असताना सर्व प्रवासी व वाहन चालकांची समस्या माणकीवलीचे माजी उपसरपंच तथा विदयमान सदस्य अजय भारती व विदयमान उपसरपंच विकास रसाळ यांनी लक्षात घेऊन आक्रमक पवित्रा घेत या ओव्हरलोड वाहतूकीवर कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामसेवकांकडे केली आहे.

तर संबंधित विभाग या रस्त्याकडे आपले लक्ष केंद्रित करेल का ? आणि ओव्हरलोड वाहतूकीवर कडक निर्बध लावले का ? याकडे लोकांचे लक्ष लागले आहे. तसेच यावर प्रशासनाने यावर कारवाई न केल्यास सदस्य अजय भारती व उपसरपंच विकास रसाळ यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page