Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडआपल्या " न्याय हक्कासाठी " वीज कंपनीच्या विरोधात निघणाऱ्या " क्रोध मोर्चात...

आपल्या ” न्याय हक्कासाठी ” वीज कंपनीच्या विरोधात निघणाऱ्या ” क्रोध मोर्चात ” सर्वांनी सहभागी व्हा !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत वीज कंपनीच्या दुकानात १ उपकार्यकारी अभियंता , ८ सहाय्यक अभियंता , १ कार्यालय अभियंता , कॉम्प्युटर चालवून काम करणारे अनेक क्लार्क व शेकडो वीज कामगार असूनही वीज खंडित होण्याचे प्रकार वारंवार संपूर्ण कर्जत तालुक्यात घडत असल्याने ग्राहकांच्या जीवावर पाच आकडी पगार घेणारे हि ” मस्तवाल यंत्रणा ” व ” गेंड्याची कातडी ” घालून जनतेची तमा नसलेले अधिकारी वर्ग , नक्की काय काम करतात ? याचा जाब विचारण्यासाठी ” कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समितीच्या ” वतीने शनिवार दिनांक २० जुलै २०२४ रोजी सकाळी ठीक ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकापासून सुरुवात होवून क्रोध मोर्चाचे आयोजन कर्जत वीज कार्यालय – भिसेगाव येथे करण्यात आले असून या मोर्च्यात तालुक्यातील सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे , असे आवाहन संघर्ष समितीचे ऍड. कैलास मोरे यांनी केले आहे.

गेली अनेक वर्षे वीज खंडित होवून अनेक समस्यांना सामोरे गेलेली कर्जत तालुक्याची जनता आत्ता संतप्त झाली आहे . ” ऊन असो की पाऊस – वारा ” सुरू झाल्यावर विजेच्या तारा , वायर तुटल्याची घटना वारंवार होणे , आणि हा फॉल्ट काढण्यासाठी दिवसभर वीज घालवली जाणे , ठेकेदार करत असलेल्या कामांचा ” मलिदा ” खाण्यात अधिकारी वर्ग ” गुंग ” असल्याने पोल किती खोल खणले आहेत , याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे , मात्र विजेचे बिल भरमसाठ येणे , बिल वसुलीचा तगादा , कुचकामी ट्रान्सफॉर्मर , विजे अभावी पाणी येत नसल्याने महिलांचा संताप , रुग्णालयात रुग्णांची हेळसांड , जेष्ठ नागरिकांना होणारा त्रास , खोळंबणारी कॉम्प्युटरची कामे , ठप्प झालेली बँकेची व्यवहारे , नवजात बालकांना वीज नसल्याने होणारी जीवाची कासावीस , तर विजच सर्वस्वी असल्याने दैनंदिन जीवनावर होणारा परिणाम , यामुळे वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या ” भोंगळ कारभारावर ” नागरिकांचा , महिलांचा व गोर गरीब जनतेचा आक्रोश व संताप खदखदत आहे.


कार्यकारी अभियंता – पनवेल व कर्जत उप कार्यकारी अभियंता प्रकाश देवके यांची ” हकालपट्टी ” करून येथे सक्षम अधिकारी नेमणे गरजेचे असून नुसती वसुली न करता फिल्डवर कुठली समस्या , सामुग्री ची कमतरता आहे , हे बघणे देखील गरजेचे असून तमाम कर्जत तालुक्यातील नागरिकांनी आता विजेची समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी ” नो सर्व्हिस – नो बिल ” असे असहकार आंदोलनाच्या माध्यमातून एकत्रित येवून याचा जाब विचारण्यासाठी २० तारखेच्या क्रोध मोर्चात सामील व्हा , असे आवाहन संघर्ष समितीचे निमंत्रक ऍड. कैलास मोरे यांनी केले आहे . सदरच्या मोर्च्यास कर्जत व्यापारी फेडरेशन , पोलीस मित्र संघटना , छत्रपती शिवाजी राजे तक्रार निवारण संघटना , मैत्रेय सोशल वेल्फेअर फाऊंडेशन , कर्जत संघर्ष समिती , यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे , इतरही पक्ष व संघटनांनी या मोर्चात सहभागी होणार असल्याने या क्रोध मोर्चाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page