महाबोधी बुद्ध विहार स्वतंत्र होत नाही , तोवर हा भारत देश प्रबुद्ध होणार नाही – सुभान अली शेख..
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) यापूर्वी आपल्याला कुठलेच अधिकार नव्हते , मग का अधिकार नव्हते ? असा प्रश्न पडतो , बोलण्याचा देखील अधिकार नव्हता ती जाणीव झाल्यानेच भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना सर्व अधिकार देण्यात आले . म्हणूनच जोवर जाणीव होत नाही तोवर कुणीच ” बंड ” करत नसल्याचे सांगत जोवर बौद्ध धम्माचे प्रतीक ” महाबोधी बुद्ध विहार स्वतंत्र होत नाही , तोवर हा भारत देश प्रबुद्ध होणार नाही ” असे मत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शिवचरित्र अभ्यासक, बहुजन विचारवंत, प्रबोधनकार प्रा. सुभानअली शेख यांनी शुक्रवार दि. १६ मे २०२५ रोजी कर्जत मध्ये महापुरुषांची संयुक्त जयंती महोत्सवसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात रॉयल गार्डनच्या सभागृहात उपस्थितांना मार्गदर्शन करताना मत व्यक्त केले.
या जयंती महोत्सवात त्यांच्या शुभहस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती कमिटीने त्यांना शाल पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित व स्वागत केले . यावेळी विचार पिठावर महापुरुषांची जयंती महोत्सव – २०२५ पर्व ८ चे विद्यमान अध्यक्ष ऍड. सुमित साबळे विराजमान होते . भारतीय संविधान उद्देशिकेचे वाचन याप्रसंगी करण्यात आले.
यावेळी शिवचरित्र अभ्यासक सुभान अली शेख पुढे म्हणाले की , ” लोक कल्याणकारी राजा छत्रपती शिवाजी महाराज ” यांच्या राज्याभिषेकाला देखील विरोध करण्यात आला होता . तर रायगडच्या भूमीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी पाणी पिण्याचा अधिकार मिळावा म्हणून चवदार तळ्याचे आंदोलन करावे लागले , तो अधिकार बाबासाहेबांनी मिळवून दिला . मी मुस्लिम असल्याने माझा संविधानाशी काय संबंध ? अस विचारलं जात , पण बाबासाहेबांनी या देशाला जे दिले ते सर्वांनाच विसरता येणार नाही , शिक्षणाचा , मतदानाचा , बोलण्याचा व इतर अधिकार दिले , यावर त्यांनी प्रकाश टाकला. महापुरुषांच्या विरोधात जेव्हा काही समाजद्रोही बोलतात तेव्हा तुमच्या भावना दुखावल्या गेल्या नाहीत , मग फक्त ” फुले ” पिक्चर मध्ये दाखवलेल्या दृश्यामुळेच तुमच्या भावना कश्या दुखावल्या , असा प्रश्न त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला . ज्या ठिकाणी ” तथागत भगवान गौतम बुद्ध ” यांना ज्ञान प्राप्त झाले ते बौद्ध धम्माचे प्रतिक असलेले ” महाबोधी बुद्ध विहार ” जोवर स्वतंत्र होत नाही , तोवर हा भारत देश ” प्रबुद्ध ” होणार नाही , असे ठणकावून सांगितले . कर्मकांडातून बाहेर काढणारे तथागत बुद्ध यांच्या भूमीत कर्मकांड केले जातात , ९४ दिवस होऊनही आमचे धम्म गुरु आज पर्यंत लढा देत आहेत , हे त्यांनी सांगत जोवर ” पंच शीलाचे ” आचरण होत नाही तोवर आपण बौद्ध होत नाही , असे मौलिक मत व्यक्त केले . ” ३०० करोड ” वार्षिक धम्मदान तिथे मिळत असताना त्याचा वापर ” धम्म ” वाढविण्यास होईल म्हणून विरोधकांचे हे ” षडयंत्र ” आहे , महाबोधी विहारावर कार्यरत असणारी समिती आपली नाही , म्हणून कलम 13 बदलले पाहिजे , असे मत शिवचरित्र अभ्यासक सुभान अली शेख यांनी व्यक्त केले.
यावेळी समाज कार्यात अग्रेसर असणाऱ्या समाज रत्नांचा सन्मान , सन्मान चिन्ह देऊन करण्यात आला . तर रिकी मुंढे आणि किरण कदम प्रस्तुत ” ऑर्केस्ट्रा ड्रीम मेलोडीज ” यांचा तुफान गीत गायनाचा कार्यक्रम होताना सर्व बौद्ध बांधव व महिला भगिनी यांनी उत्साह दाखवून हजारोंच्या संख्येने उपस्थिती दर्शवली . यावेळी जयंती महोत्सव – २०२५ पर्व ८ चे अध्यक्ष ऍड. सुमित साबळे सह सर्व जयंती कमिटी पदाधिकारी सभासद उपस्थित होते . याप्रसंगी जयंती महोत्सवाचे सदस्य योगेश आप्पा गायकवाड यांनी महापुरुषांच्या नावाचा जयघोष केला , सूत्र संचालन सम्यक सदावर्ते यांनी केले . महासचिव भालचंद्र गायकवाड यांनी प्रस्तावना सादर केली , तर ऍड. सुमित साबळे यांनी अध्यक्षीय भाषण करून सर्वांचे आभार व्यक्त केले . यावेळी जयंती समितीचे हिरामण भाई गायकवाड , सुनील गायकवाड , सचिन चव्हाण , ऍड. सूरज पंडित , गणेश कांबळे , ऍड. शैलेश पवार ,उमेश गायकवाड , सचिन आडसुळे , सचिन गायकवाड , त्याचप्रमाणे अन्य सदस्य , धार्मिक संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.