मावळ : तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून घडलेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायक असल्याची प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. पुलाच्या कोसळल्यामुळे काही नागरिक आणि पर्यटक नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे.
दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव आणि मदतकार्य सुरू केले. जिल्हा प्रशासनासोबतच राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद दल (NDRF) आणि शिवदुर्ग रेस्क्यू पथक देखील अल्पावधीत घटनास्थळी दाखल झाले असून, युद्धपातळीवर मदतकार्य सुरू आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “घटनास्थळी प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले असून, जखमींना आवश्यक सर्व वैद्यकीय सुविधा तातडीने पुरवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या पुलाची अवस्था जीर्ण होती, अशी प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यात येणार असून, देखभाल आणि दुरुस्तीबाबत कुठलेही दुर्लक्ष झाल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल.”
राज्य शासन या कठीण प्रसंगी बाधित नागरिकांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता फक्त अधिकृत यंत्रणांकडून मिळणाऱ्या माहितीलाच महत्त्व द्यावे आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले.