Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडज्येष्ठ समाजसेवक, निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी " महाराष्ट्र भूषण " पुरस्काराने सन्मानित !

ज्येष्ठ समाजसेवक, निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ” महाराष्ट्र भूषण ” पुरस्काराने सन्मानित !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहित आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी घेतली भेट…

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार श्री . आप्पासाहेब धर्माधिकारी यांना सन – २०२२ या वर्षाचा ” महाराष्ट्र भूषण पुरस्कार ” जाहीर करण्यात आला आहे . या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा ” बाळासाहेबांची शिवसेना ” या पक्षाचे प्रमुख मा.एकनाथ शिंदे साहेब , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , कर्जत – खालापूर मतदार संघाचे आमदार महेंद्रशेठ थोरवे , महाड चे आमदार तथा पक्ष प्रतोद भरतशेठ गोगावले , अलिबाग चे आमदार महेंद्र दळवी , पनवेल चे आमदार प्रशांत ठाकूर , पेण चे आमदार रवि पाटील , उरण चे आमदार महेश बालदी , कर्जत पंचायत समितीचे मा.उपसभापती मनोहर दादा थोरवे , कर्जत न.प.चे नगरसेवक संकेत भासे व अन्य मान्यवर रेवदंडा येथे उपस्थित राहून त्यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले.

बैठकीचे जनक व पुज्यनिय दासबोध ग्रंथातून निरूपण करून तिर्थस्वरूप नानासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ” आप्पासाहेब धर्माधिकारी ” यांनी अध्यात्माचे धडे देताना शेकडो खेडी, आदिवासी पाड्यांची भ्रमंती करून लोकांना व्यसनमुक्तीचे महत्त्व पटवून दिले आहे.अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, अज्ञान, स्त्रियांवरील अत्याचार, जातीभेद अशा कुप्रवृत्तींवर जोरदार प्रहार करत आपासाहेबांनी सद्गुणांची पेरणी केली.
त्यामुळे लाखो लोक व्यसनमुक्त होऊन परमार्थाकडे वळले.आप्पासाहेब  धर्माधिकारी यांनी आधुनिक संदर्भात दासबोधाच्या कमालीच्या सोप्या निरूपणातून विकारी मनांची मशागत करताना निर्व्यसनी समर्थ समाजाचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचले.धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ह्या सर्वांगीण पुरुषार्थाची ओळख त्यांनी , स्वतःची ओळख विसरलेल्या समाजाला करून दिली. हे कार्य संपूर्ण महाराष्ट्रभर बैठकीचे आयोजन करून त्यांनी समाजाच्या उन्नतीसाठी आपले आयुष्य अर्पण केले.१४ मे १९४६ रोजी जन्म झालेले पद्मश्री डॉ.दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी गेले ३० वर्षे निरुपण करत आहेत . बालमनावर संस्कार करण्यासाठी त्यांनी विशेष बालसंस्कार बैठक सुरु केल्या आहेत.

डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविले आहेत , तर अलीकडच्या काळात संस्थेच्या माध्यमातून दास सेवकांनी सर्वाधिक प्रमाणात वृक्षारोपण केले. त्याशिवाय वृक्षसंवर्धन , स्वच्छता अभियान , रक्तदान शिबिराचे आयोजनही नियमितरीत्या सर्वत्र करण्यात येते. गणेशोत्सव व नवरात्रौत्सवनंतर निर्माल्यातून खतनिर्मिती करून एक पर्यावरणपूरक संदेशही त्यांनी समाजाला दिला आहे . म्हणूनच त्यांना ” स्वच्छतादूत ” म्हणूनही ओळखले जातात . बालपणापासून त्यांना कीर्तन ,भजन, अध्यात्मिक वाचन याची आवड होती. या कार्याची सुरुवात त्यांचे वडील डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या सान्निध्यात राहून सुरुवात केली आहे.
आज तेच कार्य, तेवढ्याच जोमाने, तत्परतेने जगभर पोहोचविण्याचे कार्य आप्पासाहेब धर्माधिकारी करत आहेत. आज रेवदंडा येथे ” महाराष्ट्र भूषण ” आदरणीय तीर्थरूप ” पद्मश्री ” डॉ अप्पासाहेब  धर्माधिकारी व आदरणीय डॉ सचिन दादा धर्माधिकारी तसेच सर्व धर्माधिकारी कुटुंबाची भेट सर्व मान्यवरांनी घेत ” जय जय रघुवीर समर्थ ” म्हणत कृपाशीर्वाद घेतले.
- Advertisment -

You cannot copy content of this page