मावळ (प्रतिनिधी):मागील काही दिवसांच्या विश्रांती नंतर मावळ तालुक्यात पावसाने रात्रीपासून जोरदार हजेरी लावली.रात्रीपासून सातत्याने होणाऱ्या जोरदार पावसामुळे पवना धरण 100 टक्के भरले असून धरणातून 1400 क्यूसेक्सने विसर्ग नदीपात्रात करण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पवना धरण 100% टक्के क्षमतेने भरल्यामुळे विज निर्मिती ग्रुहद्वारे पवना नदी मध्ये पिण्यासाठी व सिंचनासाठी सकाळी 9:30 वाजता 800 क्यूसेक्स विसर्ग करण्यात आलेला आहे. हा विसर्ग 12 वाजता वाढवून 800 क्यूसेक्स वरून 1400 क्यूसेक्स पर्यंत करण्यात येणार आहे.
तसेच धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण पाहता कधीही पवना धरणाच्या सांडव्यावरून पवना नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची दाट शक्यता असून,पवना नदी काठच्या सर्व नागरीकांनी सतर्क रहावे. नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदी मधील पाण्याचे पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत, असे आवाहन पवना धरण पूरनियंत्रण कक्ष पिंपरी कडून केले आहे.