Thursday, September 19, 2024
Homeपुणेमावळमावळ तालुका सहाय्यक निबंधक अधिकारी विठ्ठल सुरवंशी यांचे अखेर निलंबन...

मावळ तालुका सहाय्यक निबंधक अधिकारी विठ्ठल सुरवंशी यांचे अखेर निलंबन…

मावळ (प्रतिनिधी) : मावळ तालुक्यातील सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक विठ्ठल सुर्यवंशी यांचे अखेर निलंबन झाले आहे . राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र शासनाच्या कक्ष अधिकारी पल्लवी कोळेकर यांनी सूर्यवंशी यांच्या निलंबनाचा आदेश जारी केला आहे.
सहाय्यक निबंधक विठ्ठल सुर्यवंशी यांनी एकविरा गृहनिर्माण सोसायटी तळेगाव दाभाडे , पवना कृषक संस्था , काले कॉलनी व मावळ तालुक्यातील विविध विकास सोसायटी बाबत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व नियम 1961 मधील तरतदीनुसार कार्यवाही केलेली नाही . तसेच सदर संस्थांवर आपल्या अधिकाराचा गैरवापर करून अनियमित व जाणीवपूर्वक कामकाज केल्याचे निदर्शनास येत आहे , असा ठपका ठेवून ही निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे.
कक्ष अधिकारी पल्लवी कोळेकर यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की , ज्याअर्थी , सुर्यवंशी यांनी सहकार आयुक्त कार्यालयाचे दि . 07/01/2005 रोजीच्या परिपत्रकानुसार दिलेल्या सुचना विचारात न घेता अवसायकाचा त्रैमासिक अहवाल न घेता अवसायकाला जास्तीचे मानधन मंजूर केले आहे . ज्याअर्थी , डॉ . पी . जी . पाटील , कुलगुरू महात्मा फुले कृषि विद्यापीठ , राहुरी यांना सुर्यवंशी यांनी दि . 10/08/2022 रोजी अशासकीय भाषेत पत्र लिहून गैरवर्तन केले आहे . तसेच सुर्यवंशी यांचा विद्यापीठाच्या अंतर्गत बाबींशी काहीही संबंध नसताना कुलगुरूंच्या कामकाजात व त्यांच्या अधिकार क्षेत्रात हस्तक्षेप केलेला असून ही बाब अंत्यत गंभीर स्वरूपाची आहे. त्याचबरोबर सुर्यवंशी यांनी सदरचे पत्र सोशल मिडीयावर टाकुन कुलगुरूंची पर्यायाने विद्यापीठाची हेतुस्परपणे बदनामी केलेली आहे.
उपरोक्त कृती ही महाराष्ट्र नागरी सेवा ( वर्तणूक ) नियम 1979 मधील नियम 3 चा भंग करणारी असल्यामुळे विठ्ठल नामदेव सुर्यवंशी ( सहायक निबंधक , सहकारी संस्था ता . मावळ जि . पुणे ) हे शिस्तभंगविषयक कार्यवाहीस पात्र ठरत आहेत.
त्याअर्थी , आता महाराष्ट्राचे राज्यपाल महाराष्ट्र नागरी सेवा ( शिस्त व अपील ) नियम 1979 च्या भाग 2 नियम 4 चे खंड ( 1 ) ( अ ) अन्वये प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करुन विठ्ठल नामदेव सुर्यवंशी , सहायक निबंधक सहकारी संस्था ता . मावळ जि . पुणे यांना आदेशाच्या दिनांकापासून करण्यात येत आहे . शासन आणखी असाही आदेश देत आहे की , हा आदेश अंमलात असेल या कालावधीत विठ्ठल सुर्यवंशी , सहायक निबंधक सहकारी संस्था ता . मावळ जि . पुणे यांचे मुख्यालय विभागीय सहनिबंधक , सहकारी संस्था , पुणे हे राहील व शासनाच्या पूर्व परवानगी शिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही .
निलंबन कालावधीत विठ्ठल सूर्यवंशी , सहायक निबंधक सहकारी संस्था ता . मावळ जि . पुणे यांना महाराष्ट्र नागरी सेवा ( पदग्रहण अवधी , स्वीयेत्तर सेवा आणि निलंबन , बडतर्फी इ . काळातील प्रदाने ) नियम 1981 च्या नियम 68 अन्वये प्रथमतः निलंबित केलेल्या दिनांकापासून तीन महिन्याच्या कालावधीसाठी 50 टक्के निर्वाह भत्ता देय राहील . तद्नंतर तीन महिन्यापेक्षा निलंबनाचा कालावधी जास्त झाल्यास निर्वाह भत्त्याच्या रकमेत 50 टक्के इतकी वाढ करण्यात यावी . महागाई भत्त्याखेरीज नियमानुसार अनुज्ञेय असणारे इतर भत्तेही त्यांना अनुज्ञेय रहातील . सदर निर्वाह भत्ता देण्याबाबतची कार्यवाही करण्यास विभागीय सहनिबंधक , सहकारी संस्था , पुणे यांना प्राधिकृत करण्यात येत आहे.
विठ्ठल सुर्यवंशी , सहायक निबंधक सहकारी संस्था ता . मावळ जि . पुणे यांना वैयक्तीक उद्योगधंदे व अन्य नोकरी करता येणार नाही , असे केल्यास महाराष्ट्र नागरी सेवा ( वर्तणूक ) नियम 1979 मधील तरतूदींचा भंग समजण्यात येईल व ते शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र ठरतील व त्यांना निलंबन भत्ताही नाकारला जाईल , असा आदेश जारी करण्यात आला आहे.
सुर्यवंशी यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे , मावळचे माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी यांच्या नेतृत्वाखाली 15 सप्टेंबर 2022 रोजी वडगांव येथील निबंधक कार्यालयावर आंदोलन करण्यात आले होते . सुर्यवंशी यांच्या भ्रष्ट कारभाराचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी सहकार मंत्र्यांना पुरावे सादर करत अखेर विठ्ठल सुर्यवंशी यांचे निलंबन करण्यात आले.
- Advertisment -

You cannot copy content of this page