भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) शिक्षकांची सर्वांत अग्रेसर असणारी प्राथमिक शिक्षक संघाची राज्य कार्यकारीनी मंडळाची सभा यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे अनेक विषयांवर संपन्न झाली . यावेळी व्यासपीठावर प्रमुख मान्यवर म्हणून ग्राम विकास मंत्री सन्मा. जयकुमार गोरे , कोकण पदवीधर आमदार सन्मा. निरंजन डावखरे , आमदार सन्मा. प्रवीण स्वामी , केशवराव जाधव , माधवराव पाटील, राजाराम वरूटे , राजेंद्र फुलावरे , रायगड जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हात्रे, नितीन अहिरे , यांच्यासह अनेक मान्यवर कार्यकारणी सभेस उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील अनेक शाळा बंद करण्याचा घाट शासनाने घातला असून त्यासाठी १५ मार्च २०२४ रोजी संच मान्यतेचा शासन निर्णय काढून शासनाने त्यावर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे , त्यामुळे राईट टू एज्युकेशन (आर टी ई ) शिक्षण हक्क कायद्यास छेद दिला जाणार आहे , यास विरोध म्हणून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या कार्यकारीनी सभेचे आयोजन यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे करण्यात आले होते . कार्यकारीनी सभेत ग्राम विकास मंत्री गोरे यांनी व सांगितले की , १५ मार्च २०२४ संच मान्यतेचा अन्यायकारक शासन निर्णयातील जाचक अटीत आम्ही नक्कीच बदल करू , तसेच शिक्षकांना सतत भेडसावणारी ” मुख्यालयी राहण्याची अट ” यातही बदल करू शिवाय शिक्षण सेवक पद कायमचे रद्द करणे , वेतन त्रुटी अहवालावर तत्काळ कार्यवाही करणे , शिक्षकांना सतत येणाऱ्या विविध लिंक यावर कायमची बंदी घालणे , शिक्षकांना १०:२०:३० आश्वासित प्रगती योजना लागू करणे , २००६ , २००७ , २००८ मध्ये सेवेत लागलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन लागू करण्यासाठी अधिसूचना मिळवून देण्याचे आश्वासन मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले , तर कोकण विभागीय पदवीधर संघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी ” शिक्षक संघाच्या पाठीशी मी कायम राहणार असून कुठलीही समस्या निर्माण झाल्यास संघाच्या कार्यकर्त्यांनी मला कधीही फोन करा मी सोडवण्यासाठी कटिबद्ध राहील ” असे सांगितले तर जुनी पेन्शन संघटनेचे राजेंद्र फूलावरे यांनी व्यासपीठावरून बोलताना सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू होण्यासाठी संघ सर्व ताकदिनीशी प्रयत्न करणार असल्याचे व सर्वप्रथम २००६ – २००७ – २००८ मध्ये सेवेत लागलेल्या शिक्षकांना अधिसूचना मिळवून , जुनी पेन्शन लागू करण्यासाठी प्रयत्न करत आहोत व ते प्रयत्न अंतिम टप्प्यात असल्याचे ” जाहीर केले तसेच रायगड जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हात्रे यांनी ” आजच्या सभेनंतर १५ मार्च २०२४ चा संच मान्यतेचा अन्यायकारक जी. आर. कायमचा रद्द झाला पाहिजे , असे ठणकावून सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ठाणे जिल्हाध्यक्ष भगवान भगत यांनी केले. यावेळी राज्य कार्यकारी मंडळ सभेत रायगड जिल्ह्यातील विनया जाधव यांची महिला आघाडी प्रमुख म्हणून निवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या कार्यकारी मंडळ सभेस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ७०० हून अधिक पदाधिकारी उपस्थित होते . यामध्ये संघटनेचे अध्यक्ष केशवराव जाधव , माधवराव पाटील , राजाराम वरुटे , राजेंद्र फुलावरे , राजेंद्र म्हात्रे , किसनराव घोलप ,भगवान भगत, नितीन अहिरे ,जीवन तेलंगे, जगदीश म्हात्रे , संदीप पाटील, सचिन जाधव , प्रमोद भोपी , निलेश साळवी , विनया जाधव , जयश्री म्हात्रे , जागृती तेलंगे , विनोद कवळे , यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती .