Friday, October 18, 2024
Homeपुणेलोणावळाजिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या निर्देशानुसार पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना..

जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या निर्देशानुसार पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना..

भूशी डॅम दुर्घटना: कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू, प्रशासन अलर्ट..

लोणावळा : ( श्रावणी कामत ) भूशी डॅम परिसरात 30 जून 2024 रोजी एक दुर्दैवी घटना घडली. एकाच कुटुंबातील पाच सदस्य पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मागील काही आठवड्यांपासून पुणे जिल्ह्यातील पश्चिम घाटात पावसाचे प्रमाण वाढले आहे. यामुळे मावळ, मुळशी, खेड, जुन्नर, भोर, वेल्हा, आंबेगाव या भागात पर्यटकांची गर्दी वाढली आहे. पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या पर्यटकांसाठी ही ठिकाणे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली आहेत. तथापि, या भागातील पावसामुळे नद्यांमध्ये पूर येत असून, सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक आहे.
लोणावळ्यातील भूशी डॅम दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव यांनी 1 जुलै 2024 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संबंधित अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचनांचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत.
यापूर्वीच, 16 एप्रिल 2024 रोजी झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनाच्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली होती. जिल्ह्यातील संभाव्य आपत्ती प्रवण ठिकाणांची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, वन विभाग, पुरातत्व विभाग आणि इतर आवश्यक यंत्रणांनी उपविभागीय अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष भेट देऊन आवश्यक ती सुरक्षेची उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.
प्रेक्षणीय ठिकाणांच्या आसपास प्रतिबंधात्मक क्षेत्र निश्चित करून, पर्यटकांच्या सुरक्षेसाठी नियंत्रण रेखा आखण्यात येणार आहे. तसेच, अपघातग्रस्त ठिकाणी शोध व बचाव पथक, लाइफ जैकेट्स, आणि रेस्क्यू बोटी यांच्या मदतीने आपत्ती व्यवस्थापनाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
पोलीस प्रशासनाने गर्दीच्या ठिकाणी अधिसूचना निर्गमित करून त्या तंतोतंत पाळण्याची अपेक्षा आहे. आपत्ती प्रवण ठिकाणी पर्यटकांसाठी स्पष्ट सूचना असलेले फलक लावून सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.
या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सुहास दिवसे यांनी पर्यटकांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश परिपत्रकाद्वारे दिले आहेत.
प्रशासनाने पुन्हा एकदा सजग राहून अपघात टाळण्यासाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. पर्यटकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे अत्यावश्यक आहे, जेणेकरून भविष्यात अशा दुर्दैवी घटनांचा पुनरावृत्ती टाळता येईल.
- Advertisment -

You cannot copy content of this page