Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जत तहसीलदार शीतल रसाळ यांची " बेबंदशाही " वागणूक..

कर्जत तहसीलदार शीतल रसाळ यांची ” बेबंदशाही ” वागणूक..

रेल्वे बोग‌द्याच्या कामामुळे झालेली नुकसान भरपाई कधी मिळणार ?
मा. सरपंच प्रमिला बोराडे १५ ऑगस्ट रोजी करणार आमरण उपोषण..

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) आपल्यावर तसेच गावातील ग्रामस्थांवर झालेल्या अन्यायाविरोधात लोकशाहीच्या मार्गाने ” आमरण उपोषणाचा ” मार्ग पत्करून आवाज उठविण्याचे काम व त्यातून न्याय मिळण्याच्या हेतूने व आपल्या हक्कासाठी आजपर्यंत कर्जत तालुक्यात अनेक आमरण उपोषण झाले आहेत . संबंधित अधिकारी वर्ग नागरिकांच्या न्याय हक्काकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करून अन्याय घडवीत असतात . या सर्व बाबीत तालुक्याचा प्रमुख म्हणून मा. तहसीलदार – कर्जत यांनी योग्य लक्ष देणे गरजेचे असते , मात्र आजतागायत कर्जत तहसीलदार शीतल रसाळ यांच्या ठोस निर्णय न घेण्याच्या भूमिकेमुळे अनेकांना विविध विषय घेवून आमरण उपोषणाला बसावे लागले आहे . उपोषण सोडते वेळी हेच तहसीलदार लेखी आश्वासन देवून उपोषण सोडवतात , मात्र आश्वासनाची पूर्तता करत नाहीत , अश्या त्यांच्या ” बेबंदशाही ” वागण्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

कर्जत शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या हालिवली व किरवली या दोन्ही गावांमधून गेलेल्या कर्जत – पनवेल रेल्वे बोग‌द्याच्या कामामुळे गेली २ वर्षे येथील ग्रामस्थ यातना भोगत आहेत . या बोगदा ब्लास्टिंग कामामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी , यासाठी येथील मा. सरपंच सौ. प्रमिला सुरेश बोराडे यांनी २ वेळा आमरण उपोषणाचा मार्ग पत्करला होता . मात्र वेळोवेळी हे संविधानीक मार्गाने न्याय मिळवण्याच्या उपोषण मार्गाचा ” गळचेपी ” करून न्याय देतो , असे सांगून उपोषण सोडविण्यात कर्जत तहसीलदार आज २ वर्षे होवून देखील त्यावर उपाय शोधून येथील ठेकेदारावर व रेल्वे प्रशासनावर कडक कारवाई करून येथील ग्रामस्थांना न्याय देवू शकले नाहीत . याची वेळोवेळी माहिती जिल्हाधिकारी व प्रांत अधिकारी कर्जत यांना देण्यात आलेली असताना त्यांनी देखील कर्जत तहसीलदार यांची पाठराखण केलेली दिसण्यात येते.

कर्जत तहसीलदार यांच्या माध्यमातून रेल्वे प्रशासन व ठेकेदार यांच्या वतीने लेखी आश्वासन देण्यात आले कि , दोन्ही गावच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येईल , (प्रत्येकी सहा सहा बोअरवेल अशा दोन्ही गावासाठी १२ बोअरवेल ) दोन्ही गावातील घरांचे , आदिवासी वाडी किरवली , बौद्धवाडी व परिसरातील घरांची झालेली आर्थिक नुकसान भरपाई देण्यात येईल , तसेच गावातील अंतर्गत रस्ते तयार करून देण्यात येतील , मात्र या सर्व आश्वासनांना कर्जत तहसीलदार शीतल रसाळ यांनी ” हरताळ ” फासला असून आमची घोर ” फसवणूक ” करून आमच्यावर अन्याय केला असल्याने काही कालावधीसाठी स्थगित केलेले आमरण उपोषण देशाच्या स्वातंत्र्याच्या दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय – अलिबाग येथे सुरू करणार असल्याचे निवेदन हालिवली मा. सरपंच सौ. प्रमिला सुरेश बोराडे यांनी दिले आहे . यावर आता जिल्हाधिकारी , कर्जत प्रांत अधिकारी व बेबंदशाही माजवणारे कर्जत तहसीलदार शीतल रसाळ काय निर्णय घेतात , याकडे समस्त कर्जत तालुक्याचे लक्ष लागून आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page