Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडरेल्वे मंत्री " गल्लीत " पण कर्जत रेल्वे पॅसेंजर असो. चे अध्यक्ष...

रेल्वे मंत्री ” गल्लीत ” पण कर्जत रेल्वे पॅसेंजर असो. चे अध्यक्ष रहातात ” दिल्लीत ” मग समस्या कोण मांडणार ?

कमिटी बरखास्त करून कर्जतमध्ये रहाणारा अध्यक्ष नेमण्याची कर्जतकरांची मागणी…

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत रेल्वे स्थानकात अनेक समस्या असताना रेल्वेच्या समस्या मांडण्यास कर्जत रेल्वे पॅसेंजर असो. नेहमीच कुठेतरी कमी पडताना दिसत आहेत . त्यामुळे वर्षेनुवर्षे या समस्या ” खितपत ” पडल्या असून याचा पाठपुरावा ” योग्य वेळी – योग्य ठिकाणी – योग्य व्यक्तीकडे ” होत नसल्याचे दिसून येत आहे . कर्जत रेल्वे पॅसेंजर असो. कर्जत प्रवाशांची संघटना असून याचे अध्यक्ष ” मुंबईत ” रहात असल्याने ते पर्यायी वेळ देत नसल्याची ” ओरड ” देखील कर्जतकर प्रवाशांची असून हि कमिटी जवळजवळ आठ वर्षे झाली अद्यापी बदलली नसल्याने बेकायदेशीर असल्याचे म्हणणे देखील यापूर्वी या प्रवासी संघटनेच्या माजी अध्यक्षांनी मांडले होते . त्यामुळे कर्जत स्थानकावर केंद्रीय रेल्वे मंत्री येवून ही त्यांना समस्या न सांगणाऱ्या या कमिटीची ताबडतोब ” उचलबांगडी ” करावी , अशी मागणी रेल्वे प्रवासी वर्गातून होत आहे.


नुकतेच दोन दिवसांपूर्वी शनिवार दिनांक २० जुलै २०२४ रोजी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव हे पुण्याला जात असताना कर्जत रेल्वे स्थानकात उतरले होते . हा त्यांचा पूर्व नियोजित कार्यक्रम असल्याने कर्जत स्थानकावर अनेक पक्ष , अन्यायग्रस्त गावातील नागरिक , तक्रारदार उपस्थित राहून अनेकांनी तक्रारीचे निवेदन दिले . मात्र या सर्वाँआधी प्रवासी वर्गाच्या समस्यांची भूमिका मांडणारी ” कर्जत रेल्वे पॅसेंजर असोशियशनचे ” अध्यक्षासहित एक ही पदाधिकारी व सदस्य कर्जत रेल्वे स्थानकावर उपस्थित नव्हते . यामुळे कर्जतकरांच्या ” डझनभर ” असलेल्या ” कोरोना काळात ” उपस्थित झालेल्या गंभीर समस्या म्हणजे कर्जत स्थानकावर पुण्यावरून आलेल्या गाड्या न थांबणे , अनेक गाड्या रद्द करणे , शटल गाडी बंद असणे , कर्जत – पनवेल रेल्वे काम संथ गतीने असणे , कर्जत रेल्वे स्थानकावर प्रवाश्यांना इकडून तिकडे जाण्यासाठी मध्यंतरी पुल असणे , शौचालय २४ तास सुरू नसणे , भिसेगाव – गुंडगे बाजूला तिकीट घर , व पार्किंग ची सेवा , रिक्षा स्टँड नसणे , आदी समस्या मांडल्या गेल्या नाहीत.

केंद्रीय रेल्वे मंत्री असे वारंवार कर्जतमध्ये येत नसल्याने प्रवासी संघटनेने जर समस्या निवेदन देवून व त्यांच्याशी चर्चा करून रितसर समस्या मांडल्या असत्या तर त्या नक्कीच सुटू शकल्या असत्या , असे अनेक प्रवासी वर्गाचे म्हणणे आहे.


केंद्रीय रेल्वे मंत्री ” गल्लीत ” येवूनही , पण जर कर्जत रेल्वे पॅसेंजर असो. चे अध्यक्ष ” दिल्लीत ” रहात असतील तर हि भेट शक्यच नसल्याने कर्जतकर प्रवाशांच्या समस्या सोडविण्यासाठी कर्जतमध्ये रहाणारा व रेल्वे प्रवास करणारा अध्यक्ष नेमावा , व हि अनेक वर्षांपासून असलेली कामचुकार बेकायदेशीर कमिटी बरखास्त करावी , अशी मागणी कर्जत रेल्वे प्रवासी वर्गाने केली आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page