Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यातून बारणेंचा विजय निश्चित !

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यातून बारणेंचा विजय निश्चित !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) मी विकास कामे करत असताना कधीच राजकारण केले नाही , म्हणूनच सर्व पक्षात माझे विरोधक कधीच नाहीत , मात्र माझ्या समोर उभ्या असलेल्या उमेदवारास माझे विकास कार्य कधीच दिसले नाही म्हणूनच ते बिनबुडाचे नुसते आरोप करत आहेत , मात्र तुमच्या सर्वांच्या मेहनतीमुळे मी पुन्हा विजयी होणार , असा आत्मविश्वास आज महायुतीचे मावळ लोकसभा मतदार संघाचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांनी कर्जतमध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संवाद मेळाव्यात व्यक्त केला . आज शुक्रवार दिनांक ३ मे २०२४ रोजी मावळ लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ कर्जत खालापूर मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा ” संवाद मेळावा ” रॉयल गार्डन येथे आयोजित केला होता.

यावेळी व्यासपीठावर खासदार तथा उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे ,राष्ट्रवादीचे नेते सुधाकर भाऊ घारे , मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके ,प्रदेश चिटणीस अशोक भोपतराव , हनुमंत पिंगळे , प्रदेश चिटणीस भरत भगत , कर्जत तालुका अध्यक्ष भगवान शेठ चंचे , महिला ता. अध्यक्ष रंजना धुळे , जिल्हा महिला अध्यक्षा उमा मुंडे , युवक जिल्हा अध्यक्ष अंकित साखरे , जिल्हा नेते एकनाथ दादा धुळे , शिवसेना तालुका प्रमुख संभाजी जगताप , शिवाजी खारीक , राष्ट्रवादीचे नेते दत्ता मसुरकर , कर्जत शहर अध्यक्ष भगवान शेठ भोईर , युवक ता. अध्यक्ष स्वप्नील पालकर , संतोष बैलमारे , युवक शहर अध्यक्ष सोमनाथ पालकर , मधुकर घारे , त्याचप्रमाणे अनेक पदाधिकारी , महिला पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी आप्पा बारणे पुढे म्हणाले की , मी खासदार म्हणून गेली १० वर्षे आदिवासी , कामगार यांच्या घरात , दुर्गम परिसरात रस्ता – वीज – पाणी दिले आहे , पर्यटन वाढविण्याचे काम केले , रेल्वे पट्ट्यातील अनेक कामे अजून सुरू आहेत , कर्जत पनवेल रेल्वेच काम सुरू आहे , ती सेवा सुरू झाल्यावर हजारो युवकांना रोजगार मिळेल , अशी अनेक कामे निधी आणून या मतदार संघात मोदी सरकारच्या माध्यमातून केले आहे , आमचे सर्व आमदार रायगडात काम करत आहेत , सर्व घटक पक्षांना बरोबर घेवुन अजून जोमाने काम करू , ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे , म्हणूनच ” धनुष्य बाण ” या निशाणी वर मत देवून निवडून दया , असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

तर मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके म्हणाले की , मी कर्जत मतदार संघाच्या पाठीशी सदैव ठाम आहे , अजित दादा म्हणतात , मला मावळात ” सुनील ” मिळाला , तसा रायगडात ” सुधाकर ” मिळाला , पिक्चर हिट व्हायचा असेल तर पहिले ट्रेलर दाखवावा लागतो , आपला हिरो सुधा भाऊ आहे , त्याला हिट करायचं असेल तर धनुष्य बाणावर मत देवून महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांना बहुमताने निवडून द्या , रायगडात सुनील तटकरे साहेब , व मावळात आप्पा बारणे यांना मोठ्या ताकदीने निवडून देण्याचे आहे , असे मत व्यक्त करताना , २०२४ साली माझ्याबरोबर सुधाकर भाऊ घारे तुम्ही देखील आमदार असणार आहात , आजची गर्दी तुमच्यावर प्रेम करणारी , राष्ट्रवादीवर प्रेम करणारी आहे , भविष्यात महायुती रहाणार आहे , पण तुम्ही विधी मंडळात आमदार असणार आहात , अशी भविष्यवाणी केली.

याप्रसंगी सुधाकर भाऊ घारे यांनी कार्यकर्त्यांना सूचित केले की , सर्व क्षेत्रात प्रगती करायची असेल तर सक्षम नेतृत्वाची गरज असते , ते नेतृत्व मोदी साहेब आहेत . अजित दादांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आपल्याला ” विकास ” डोळ्यासमोर येतो , आपल्याला सर्वांना त्यांच्या आदेशाचे काम करण्याचे आहे , आपण महायुतीत सामील झालो आहोत , बारणे यांना निवडून देण्याचे आहे , या आठ दिवसात आपल्याला खूप काम करायचे आहे , सर्वांच्या साक्षीने सांगतो की , आप्पा माझा प्रत्येक कार्यकर्ता तुम्हालाच ” धनुष्य बाणावर ” मत देतील , असे आश्वासन दिले . यावेळी दत्ता मसुरकर , हनुमंत पिंगळे , भरत भाई भगत , उमा मुंडे , अशोक भोपतराव , अंकित साखरे यांनी देखील कार्यकर्ते व पदाधिकारी यांना मार्गदर्शन करून महा युतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांना निवडून देण्याचे आवाहन सर्वांना केले . यावेळी अनेकांचा पक्षप्रवेश मान्यवरांच्या उपस्थितीत झाला . या मेळाव्यात गर्दीने उच्चांक गाठला होता.
- Advertisment -

You cannot copy content of this page